header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

न्हावे गावात भीषण पाणीटंचाई; १५ दिवसांनी अवघ्या ३० मिनिटांचा पाणीपुरवठा, ग्रामस्थ संतप्त.

https://hinduprakashwarta.com/wp-content/uploads/2026/06/IMG-20260612-WA0061.jpg

दै हिंदू प्रकाश वार्ता उरण रायगड प्रतिनिधी 

पनवेल तालुक्यातील न्हावे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावात ग्रामपंचायतीमार्फत तब्बल १४ ते १५ दिवसांनी केवळ ३० मिनिटांसाठी पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामसुधारक मंडळ न्हावे माजी अध्यक्ष योगेश कुंडलिक पाटील यांनी केली आहे.

योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अनेक कुटुंबांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे हाल होत आहेत.

गावातील मुख्य जलवाहिनीवरून काही व्यक्तींनी अनधिकृत जोडण्या घेऊन पाणीचोरी सुरू ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर जोडण्या तोडण्यात आल्या होत्या. मात्र त्या पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत असल्याने पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकारामुळे अधिकृत ग्राहकांना मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी घट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

योगेश कुंडलिक पाटील यांनी सांगितले की, गावातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सिडको प्रशासन, संबंधित शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

सध्याची परिस्थिती पाहता गावात तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी पुढे आली आहे.

पाणीपुरवठा अनियमित असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवावे लागत आहे. त्यामुळे पाणी दूषित होण्याचा धोका वाढला असून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ पाणीपुरवठ्यापुरता मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय बनला आहे.

“न्हावे गावातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने तातडीने पाणीचोरी रोखून टँकरची व्यवस्था करावी व दीर्घकालीन उपाययोजना जाहीर कराव्यात. अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा  ग्रामसुधारक मंडळ न्हावे माजी अध्यक्ष योगेश कुंडलिक पाटील यांनी दिला आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90