हिंगोली : जिल्ह्यात वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर सक्तीने लादण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिला.
दि. १६ जुलै २०२६ रोजी शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणचे हिंगोली जिल्हा अधीक्षक अभियंता श्री. चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर सक्तीने बसवू नयेत, विद्यमान पोस्टपेड मीटर कायम ठेवावेत, स्मार्ट मीटरचे मॉडेल, उत्पादक कंपनी, BIS/CEA मान्यता, अचूकता चाचणी (Accuracy Test), कॅलिब्रेशन अहवाल, ग्राहकांच्या डेटाची सुरक्षितता, गोपनीयता, सायबर सुरक्षा, रिमोट डिस्कनेक्शनचे नियम, मीटर बिघाड झाल्यास तक्रार निवारण व भरपाईची प्रक्रिया तसेच स्मार्ट मीटर बंधनकारक असल्यास त्यासंबंधीचा कायदा, शासन निर्णय किंवा MERC आदेश यांची माहिती ग्राहकांना देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय, हिंगोली जिल्ह्यात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच बंद पडलेल्या व चोरी गेलेल्या डीपींच्या प्रश्नावर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी अधीक्षक अभियंता श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील वीज ग्राहकांची माहिती देताना सांगितले की, हिंगोली जिल्ह्यात एकूण १,५१,९२४ वीज जोडणी ग्राहक असून त्यापैकी ५३,६८० ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, तर ९८,२५४ ग्राहकांकडे अद्याप स्मार्ट मीटर बसविण्यात आलेले नाहीत.
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. भीमराव हातीअंभिरे, जिल्हा निरीक्षक पंकज बोराड, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रवि शिंदे, विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, गणेशराव गडदे, मनीषा आखरे, माधव कोरडे, मोईन बागवान, बाबुराव दळवी, डॉ. वेदांत मरळे, सोनू चव्हाण, रमेश जाधव, राजू बाभळे, प्रफुल पाईकराव, प्रभू शिंदे, सिराज कुरेशी, राजाराम पोटे, सुनील मस्के, सुभाष सरडे, उत्तमराव पोटे, रमेश ढबाले, सुभाष सापनार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.