header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90

सरस्वती भुवन महाविद्यालयासमोर कायमची जलकोंडी; वर्षानुवर्षे तुंबणाऱ्या पाण्यावर मनपा उपाय कधी करणार?

वर्षानुवर्षे कायम असलेल्या समस्येकडे मनपाचे दुर्लक्ष; शहर बस थांब्याजवळ वाहतूक कोंडी

हिंदू प्रकाशवार्ता प्रतिनिधी : सिद्धेश्वर थोर

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : शहरात अद्याप जोरदार पाऊस झालेला नसतानाही सरस्वती भुवन महाविद्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी व्यवस्था नसल्याने या ठिकाणी दरवर्षी हीच समस्या निर्माण होत असून विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असतानाही महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सरस्वती भुवन महाविद्यालय परिसर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. दररोज हजारो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच नागरिक या मार्गाचा वापर करतात. याच ठिकाणी महानगरपालिकेच्या शहर बसचा थांबा असल्यामुळे प्रवाशांचीही मोठी गर्दी असते. मात्र रस्त्यावर पाणी साचल्याने बसमध्ये चढताना आणि उतरताना विद्यार्थ्यांना व प्रवाशांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.

पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाहनांचा वेग मंदावल्याने या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते. चारचाकी वाहनांमुळे उडणाऱ्या पाण्याचा त्रास पादचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, शहरात अद्याप मुसळधार पाऊस झालेला नसतानाही ही अवस्था आहे. पुढील काळात जोरदार पाऊस झाल्यास या परिसरात अधिक प्रमाणात पाणी साचून रस्त्याचे तळ्यात रूपांतर होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिकांनी अनेकदा महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र पावसाळी गटार, जलवाहिनी किंवा अन्य कायमस्वरूपी तांत्रिक उपाय तातडीने राबवावेत, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून होत आहे.

in_article_ad_336x280

अजून बातम्या

in_article_ad_336x280

मुख्य बातम्या

मुख्य बातम्या

header_ad_728x90
header_ad_728x90
header_ad_728x90