प्रथमच कनिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रभारीपद; बदल्यांच्या निर्णयाची पोलिस वर्तुळात जोरदार चर्चा
फुलंब्री, फुलंब्री पोलिस ठाण्यातील अलीकडील प्रशासकीय बदल्यांमुळे पोलिस विभागासह तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे. निरीक्षक दर्जाचे असलेल्या फुलंब्री पोलिस ठाण्याचा प्रभारी कारभार सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) प्रताप नवघरे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याला नियंत्रण कक्षात पाठवून कनिष्ठ अधिकाऱ्याकडे ठाण्याची धुरा देण्यात आल्याने या निर्णयाची विशेष चर्चा सुरू आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी १३ मे रोजी केलेल्या बदल्यांमध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार फुलंब्रीचे पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली, तर नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्याकडे फुलंब्री पोलिस ठाण्याचा प्रभार देण्यात आला.
फुलंब्री हे ग्रामीण भागातील महत्त्वाचे आणि निरीक्षक दर्जाचे पोलिस ठाणे मानले जाते. अशा ठिकाणी प्रथमच एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याकडे प्रभारीपद सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या नियुक्तीमागील कारणांबाबत पोलिस विभागात विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. काहींच्या मते हा केवळ प्रशासकीय निर्णय आहे, तर काही जण या बदल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत.
विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात नियुक्ती आणि त्याचवेळी कनिष्ठ अधिकाऱ्याकडे महत्त्वाच्या ठाण्याचा कारभार सोपविण्यात आल्याने या निर्णयाकडे पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबत वरिष्ठ पातळीवरून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
दरम्यान, जिल्ह्यातील इतर प्रलंबित बदल्या, विविध शाखांमधील दीर्घकालीन नियुक्त्या आणि बदली प्रक्रियेतील निकष याबाबतही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात आणखी काही प्रशासकीय फेरबदल होणार का, याकडेही पोलिस विभागाचे लक्ष लागले आहे.
चौकट :
फुलंब्री पोलिस ठाण्यातील नियुक्तीनंतर जिल्ह्यातील बदली प्रक्रियेची चर्चा पुन्हा रंगली आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह काही विभागांमध्ये अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत असल्याचे बोलले जात असून, नियमानुसार कालावधी पूर्ण होऊनही त्यांच्या बदल्या झालेल्या नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेत समान निकष आणि पारदर्शकता राखली जाते का, असा प्रश्न उपस्थित केला जात असून आगामी वार्षिक बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.