छत्रपती संभाजीनगर : देवळाई-सातारा व बीड बायपास परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून खाजगी टँकरचे दरही गगनाला भिडले आहेत. पैसे देऊनही दोन ते तीन दिवस टँकर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर देवळाई-सातारा जनसेवा युवा कृती समितीने प्रभाग क्रमांक २६ चे नगरसेवक आप्पासाहेब विनायकराव हिवाळे पाटील यांच्यामार्फत महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांसमोर परिसरातील गंभीर परिस्थितीचे सविस्तर चित्र मांडले. देवळाई-सातारा भागातील पाण्याच्या टाक्यांची बांधकामे अत्यंत संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी कामे अद्याप सुरूही झालेली नाहीत, असेही निदर्शनास आणून देण्यात आले. नवीन पाइपलाइन व जलटाक्यांची कामे तातडीने पूर्ण करून संपूर्ण परिसराला लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महापौर समीर राजूरकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. महानगरपालिकेच्या टँकरची संख्या वाढवून परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सुरू असलेल्या जलटाक्यांच्या बांधकामांचा आढावा घेऊन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, महानगरपालिकेने पाणीप्रश्न गांभीर्याने न घेतल्यास आणि तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या काळात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देवळाई-सातारा जनसेवा कृती समितीने दिला.
यावेळी नगरसेवक आप्पासाहेब विनायकराव हिवाळे पाटील, मोहन साळवे, सविता कुलकर्णी, पदमसिंह राजपूत यांच्यासह कृती समितीचे राजीव थिटे पाटील, आबासाहेब देशमुख, एकनाथ साळुंके, राजेंद्र फिरोदिया, महेश चिद्रवार, आकाश बिराजदार, नामदेव पवार, संतोष इसादकर आदी उपस्थित होते.