वैजापूरच्या हद्दीत वाहनांवर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईवरून आरटीओ विभागातील दोन अधिकाऱ्यांमध्ये फोनवर झालेली तीव्र शाब्दिक चकमक आता चर्चेचा विषय ठरली आहे. “ही काय भारत-पाकिस्तानची बॉर्डर नाही” या वाक्यामुळे गाजत असलेल्या ऑडिओ क्लिपमुळे आरटीओ विभागातील अंतर्गत संघर्ष, अधिकार क्षेत्राचा वाद आणि कथित वसुलीच्या आरोपांवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये वैजापूर हद्दीतील वाहनांवर बाहेरून आलेल्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्याने संबंधित पथकाला वैजापूरच्या हद्दीत कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करत तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
ऑडिओमधील संभाषणानुसार, भरारी पथकातील अधिकारी योगेश मोरे यांच्याशी एका स्थानिक अधिकाऱ्याची फोनवर चर्चा झाली. यावेळी वैजापूरच्या हद्दीतील वाहनांना दंड का आकारला जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर “हद्द कुठून सुरू होते आणि कुठे संपते, हे स्पष्ट नाही” अशी भूमिका मोरे यांनी घेतल्याचे संभाषणात ऐकायला मिळते.
दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्याने या प्रकरणात अधिक गंभीर आरोप करत एका निलंबित मोटार वाहन निरीक्षकाच्या सांगण्यावरून काही वाहनांना लक्ष्य करून कारवाई केली जात असल्याचा दावा केला. वैजापूर परिसरात कथित वसुलीचे रॅकेट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी संभाषणादरम्यान केला आहे.
विशेष म्हणजे, “तुम्ही कायद्यानुसार काम करत असाल तर आम्हालाही काही आक्षेप नाही. मात्र, विशिष्ट वाहनांनाच वारंवार लक्ष्य केले जात असेल तर त्यामागील कारणांची चौकशी झाली पाहिजे,” अशी भूमिका स्थानिक अधिकाऱ्याने मांडल्याचे या क्लिपमध्ये दिसून येते.
दुसरीकडे, योगेश मोरे यांनी सर्व कारवाया नियमानुसारच करण्यात आल्याचा दावा केला आहे. संबंधित वाहनाचा टॅक्स थकीत होता, फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाले होते आणि वाहन ओव्हरलोड असल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणाच्याही सांगण्यावरून किंवा दबावाखाली कारवाई करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी संभाषणात म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे आरटीओ विभागातील समन्वयाचा अभाव, अधिकार क्षेत्रावरील संभ्रम आणि कथित वसुलीच्या आरोपांची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. मोरे यांनी या प्रकरणाची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची स्वतंत्ररित्या पुष्टी झालेली नसली तरी या प्रकरणामुळे आरटीओ विभागात मोठी खळबळ उडाली असून संबंधित आरोपांची चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.