केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचविण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या विभागीय कार्यालयात शनिवारी महत्त्वपूर्ण नियोजन बैठक संपन्न झाली.
या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, लाभार्थी संपर्क अभियान अधिक व्यापक करणे तसेच आगामी कार्यक्रमांचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, खासदार डॉ. भागवत कराड, मराठवाडा विभाग संयोजक नितीन काळे तसेच भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी उपस्थित नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करत केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांशी संपर्क वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘संकल्प ते सिद्धी’ अभियान हे केवळ सरकारी योजनांची माहिती देणारे नसून विकासाची गाथा जनतेपर्यंत पोहोचविणारे लोकसंपर्क अभियान ठरणार असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. बैठकीस नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.