जालना शहर, जिल्हा आणि पर्यायाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे. देशभरातील तब्बल ४ कोटी लोकसंख्या असलेल्या अग्रवाल समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आता जालन्याला मिळाली आहे. जालन्यातील प्रसिद्ध स्टील उद्योजक, अग्रगण्य सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले ‘कालिका स्टील’चे संचालक घनश्यामदास गोयल यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या बहुमानामुळे जालन्याचे नाव आता देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक नकाशावर अधिक ठळकपणे पोहोचणार आहे.
अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत मित्तल आणि महासचिव गोपाल गोयल यांनी श्री. गोयल यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून, या निवडीमुळे जालना जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. भारतात अग्रवाल समाजाची लोकसंख्या मोठी असून, जालन्यात या समाजाची सुमारे १ हजार घरे आणि ५,००ी च्या आसपास लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने हा आकडा मर्यादित वाटत असला, तरी जालन्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीत या समाजाचा वाटा सिंहाचा आहे. विशेषतः जालन्याची ओळख असलेल्या स्टील उद्योगात सुमारे ७५ ते ८० टक्के वर्चस्व याच समाजाचे आहे. पूर्वी केवळ व्यापार आणि उद्योगापुरताच मर्यादित असलेल्या अग्रवाल समाजाने आता शिक्षण आणि प्रशासकीय सेवेतही मोठी झेप घेतली आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक उच्चपदस्थ शासकीय अधिकारी म्हणून या समाजातील तरुण यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत, यावरही या निमित्ताने प्रकाश टाकण्यात आला.
चौकट
समाजाची उन्नती म्हणजेच देशाचा विकास: घनश्यामदास गोयल
आपल्या या नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष घनश्यामदास गोयल म्हणाले की, “आतापर्यंत आपण सर्वच समाजघटकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करत आलो आहोत. मात्र, आता राष्ट्रीय स्तरावरील मोठी जबाबदारी मिळाल्यामुळे अग्रवाल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक गतीने काम करावे लागणार आहे. हा समाज मुख्यत्वे उद्योजक आणि व्यापारी असल्याने, जेव्हा या समाजाची प्रगती होते, तेव्हा देशाची आर्थिक घडी मजबूत होते. समाजाच्या भरभराटीतूनच इतर सर्व समाजघटकांना रोजगार, व्यवसाय आणि नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.”
घनश्यामदास गोयल यांच्या या निवडीबद्दल जालन्यातील उद्योग जगतातून, राजकीय नेत्यांकडून आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत केले जात असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.