१० वी-१२ वी परीक्षेत ८७ ते ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव; चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर
छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे दहावी व बारावी परीक्षेत ८७ ते ९९ टक्के गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. समर्थनगर येथील श्री समर्थ राम मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. विश्वेश घाणेकर, ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष मिलिंद दामोदरे, विहिंप मंत्री अभिषेक कादी, माणिक रत्नपारखी, संजय मांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी एकूण २४० गुणवंत विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७९ विद्यार्थी पालकांसह समारंभास उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पेन देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंजली गोरे यांनी केले. प्रमुख अतिथींचे स्वागत सुरेखा पारवेकर, स्मिता नगरकर, मोहन काळे, गायत्री न्यायाधीश, अंजली देशपांडे, छाया खोचे, वैभव कुलकर्णी आणि ॲड. अश्विनी कुलकर्णी यांनी केले.
यावेळी ब्राह्मण महासंघाकडे शिष्यवृत्तीसाठी ५७ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती देण्यात आली. त्यापैकी चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली असून, पात्रतेनुसार आणखी सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी दिली.कार्यक्रमाबाबत उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे स्वागत केले.
चौकट :
शिष्यवृत्तीसाठी ५७ अर्ज; आणखी सहा विद्यार्थ्यांना संधी
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडे शिष्यवृत्तीसाठी ५७ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी चार विद्यार्थ्यांना यावेळी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. उर्वरित पात्र विद्यार्थ्यांची छाननी करून आणखी सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी दिली.