सडलेल्या आंब्यांचे ढिगारे, नारळाच्या करवंट्या आणि प्लास्टिक कचऱ्याने परिसर अस्वच्छ; पावसाळ्यात दुर्गंधी व रोगराईचा धोका
प्रतिनिधी सिद्धेश्वर थोर
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी एक असलेल्या छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र समोर आले आहे. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या बाजारपेठेत सडलेली फळे, भाजीपाल्याचा कचरा, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक पिशव्या आणि टाकाऊ साहित्याचे ढिगारे जागोजागी पडल्याने स्वच्छतेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दररोज हजारो शेतकरी आपला कृषी माल विक्रीसाठी या बाजार समितीत आणतात. तसेच व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते. लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या महत्त्वाच्या बाजारपेठेची ओळख शेतकऱ्यांच्या आर्थिक केंद्र म्हणून आहे. मात्र परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि सडलेला माल पाहता बाजार समितीची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
बाजार समिती परिसरातील काही भागांत सडलेल्या आंब्यांचे ढिगारे पडून असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर अननसाचे अवशेष, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंचे ढिगारे उघड्यावर पडलेले आहेत. या कचऱ्यातून दुर्गंधी पसरत असून परिसरात माशा आणि डासांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे शहरासह ग्रामीण भागातील अनेक नागरिक ताजा भाजीपाला व फळे खरेदी करण्यासाठी बाजार समितीत येत असतात. मात्र परिसरातील अस्वच्छतेमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पावसाळा सुरू झाल्याने सडलेल्या कचऱ्यावर पावसाचे पाणी साचून दुर्गंधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच अशा परिस्थितीत आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात, अशी भीती नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे.
व्यापारी आणि शेतकरी वर्गाकडूनही नियमित स्वच्छता, कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करण्याची मागणी होत आहे. बाजार समिती प्रशासनाने तातडीने व्यापक स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.