हिंदू प्रकाशवार्ता/प्रतिनिधी
सोयगाव,दि.३० जून
वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने मुख्य वीज तार तुटून रस्त्यावर पडलेली असताना त्यावर गेलेल्या बैलगाडी च्या बैलाला विजेचा धक्का लागून बैल जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारात जोगेश्वरी रस्त्यावर घडली यामध्ये बैलगाडी मध्ये असलेल्या चार ते पाच जणांनी उड्या मारल्या ने ते बचावले आहेत पेरणी करून घरी येत असताना हा प्रकार घडला.
या घटनेत शेतकरी शब्बीर रुस्तम तडवी व त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले.ऐन खरीप हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
नांदगाव तांडा शिवारातील गट क्रमांक ७३ मध्ये शब्बीर तडवी यांची सुमारे एक हेक्टर शेती आहे. रविवारी पेरणीचे काम पूर्ण करून ते बैलगाडीतून कुटुंबासह घरी परतत होते. दुपारी अचानक पाऊस व वादळी वाऱ्याचा जोर वाढला. दरम्यान रस्त्यावर येत असताना मुख्य वीजवाहिनीची तार तुटून रस्त्यावर पडली होती.पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून बैलगाडी जात असताना बैलाचा पाय जिवंत विद्युत तारेच्या संपर्कात आला.त्यामुळे जोरदार विजेचा धक्का बसून बैलाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी सतर्कता बाळगून तातडीने गाडीतून उड्या मारल्या.मात्र शेतीसाठी उपयोगी असलेल्या बैलाचा मृत्यू झाल्याने शब्बीर तडवी यांचे एक लाख रु चे नुकसान झाले आहे.खरीप हंगाम सुरू असतानाच बैल गमावल्याने पुढील शेतीची कामे कशी करावीत,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे लाईनमन सूर्यवंशी, पशुवैद्यकीय अधिकारी जोगदंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.महावितरण ने घटनेचा पंचनामा केला.
या शेतकऱ्यांला आर्थिक मदत मिळावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.