छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
“मुलींचे लग्न अडकले आहे, आजारपणाच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत, आयुष्यभराची पुंजी बुडाली… आता आम्ही काय करावं?” अशा अत्यंत वेदनादायी व्यथा मांडत आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील हजारो ठेवीदार आज रस्त्यावर उतरले. अनेक वर्षांपासून अडकलेली आपली हक्काची ठेव परत मिळावी. आदर्श पतसंस्थेतील अडकलेली रक्कम सर्व सामान्य ठेवीदारांना तातडीने परत मिळावी.या घोटाळ्यातील मुख्य दोषींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. मालमत्ता जप्त करून त्यातून ठेवीदारांची देणी भागवण्याची प्रक्रिया वेगवान करावी. या मागणीसाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘धडक मोर्चा’ काढण्यात आला. या आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलक महिला आणि नागरिकांनी हातात थाळ्या आणि घंटा घेऊन जोरदार ‘थाळी नाद’ व ‘घंटा नाद’ केला. “आमचे कष्टाचे पैसे परत द्या!”, “दोषींवर कारवाई झालीच पाहिजे!” अशा मोठमोठ्या घोषणा देत ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात होता, मात्र संतप्त ठेवीदारांनी जोरदार निदर्शने करत आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनात माजी खासदारांसह एमआयएमचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना इम्तियाज जलील यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, “येत्या ३१ जुलैपर्यंत जर शासनाने ठेवीदारांच्या पैशांबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांच्या दारात यापेक्षाही मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा थेट अल्टिमेटम त्यांनी दिला.पतसंस्थेच्या घोटाळ्यामुळे अनेक सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. आजच्या या ‘थाळी नाद’ आणि ‘घंटा नाद’ आंदोलनामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता, इम्तियाज जलील यांनी शासनाला इशारा दिली आहे. या मुदतीत सकारात्मक पावले न उचलल्यास थेट मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आंदोलन नेण्याचा इशारा दिला गेल्यामुळे आता या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. इम्तियाज जलील आणि एमआयएम नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक महिला आणि वृद्ध ठेवीदारांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी प्रशासनाकडे याचना करताना अश्रू अनावर झाले होते.