शेतकरी राजा चिंतेत
अजिंठा प्रतिनिधी सय्यद जमिरोद्दीन
राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावून नद्या-नाले तुडुंब भरले असताना अजिंठा परिसर मात्र अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीची तयारी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणीची कामे खोळंबली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.
कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, तूर यांसारख्या खरीप पिकांची पेरणी योग्य वेळी होणे आवश्यक असते. परंतु पुरेसा पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी सुरू केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केली, त्यांच्या शेतातील बियाण्यांची उगवण धोक्यात आली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बियाणे, खते, मशागतीचा वाढता खर्च आणि त्यात पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी दररोज आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.
हवामान विभागाने काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी अजिंठा परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे.
शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन पावसाअभावी नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत, पीकविमा दाव्यांची तातडीने अंमलबजावणी आणि कृषी विभागामार्फत योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.