औरंगाबाद लेणी परिसरात स्वच्छता मोहिम, १५० नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
हिंदू प्रकाशवार्ता
छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी
संभाजीनगर प्लॉगर्स-विनीत अभेद्य फाउंडेशन यांच्या वतीने उदयन शालिनी फाउंडेशन यांच्या सहकार्याने रविवारी (१२ जुलै) सकाळी ७ वाजता औरंगाबाद लेणी व बुद्ध लेणी परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात शहरातील सुमारे १५० पर्यावरणप्रेमी नागरिक व युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या मोहिमेदरम्यान ३०० किलोहून अधिक प्लास्टिक पिशव्या, चिप्स व इतर खाद्यपदार्थांची वेष्टने, प्लास्टिकच्या बाटल्या तसेच काचेच्या बाटल्या गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. अनेक स्वयंसेवकांनी डोंगरावर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत स्वच्छता राखण्याचा आणि कचरा न टाकण्याचा संदेशही दिला.
यावेळी डोंगर, किल्ले आणि पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ महानगरपालिका किंवा प्रशासनाची नाही. प्रत्येक पर्यटक, ट्रेकर आणि नागरिकाने स्वतःचा कचरा स्वतःसोबत परत आणणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आपण निर्माण केलेला कचरा आपणच योग्य ठिकाणी विल्हेवाट लावल्यास अशा स्वच्छता मोहिमांची गरजच भासणार नाही, असे आयोजकांनी सांगितले.
रविवारी अनेक युवक-युवती औरंगाबाद लेणी व बुद्ध लेणी परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यापैकी काही जण केवळ मौजमजेसाठी आले असले, तरी अनेक तरुणांनी आपला रविवार समाजासाठी देत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या स्वयंसेवकांनी कृतीतून दाखवून दिले की, सकारात्मक बदल घडवण्यासाठी फक्त इच्छा नव्हे तर कृती आवश्यक असते. ही मोहीम निखिल खंडेलवाल, वैभव मेटेरे, शिवम भावसार, रिया काळे आणि भागेश गांधी यांच्या उपस्थितीत पार पडली.
पर्यटक अन् नागरिकांना आवाहन प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे
आज इतक्या मोठ्या संख्येने युवक स्वच्छतेसाठी एकत्र आल्याचे पाहून खूप आनंद झाला. समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर अशा उपक्रमांत प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे, असे एका स्वयंसेवकाने सांगितले. कचरा टाकू नये ही भावना मनात निर्माण व्हावी
आपण डोंगर स्वच्छ करून निघून जाणे हा उद्देश नाही. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात ‘कचरा टाकायचा नाही’ ही भावना निर्माण करणे, हाच या मोहिमेचा खरा यशस्वी परिणाम आहे, असे एका महिला स्वयंसेविकेने भावना व्यक्त करत सांगितले.
संभाजीनगर प्लॉगर्स, विनीत अभेद्य फाउंडेशन आणि उदयन शालिनी फाउंडेशनच्या वतीने पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवूया, कचरा स्वतःसोबत परत घेऊन जाऊया आणि स्वच्छ, सुंदर छत्रपती संभाजीनगर घडविण्यास हातभार लावूया, असे आवाहन नागरिक व पर्यटकांना करण्यात आले.
कोण काय म्हणतात
“स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येक नागरिकाची सवय बनली पाहिजे. आपण निसर्गाकडून भरभरून घेतो, आता त्याचे जतन करण्याची जबाबदारीही आपलीच आहे.