-राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश
येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत मुंबईत आढावा बैठक संपन्न
हिंदू प्रकाश वार्ता प्रतिनिधी.
परभणी : येलदरी धरणाच्या उद्भवातून जिंतूर तालुक्याकरिता बंद पाईपलाईनद्वारे (पी.डी.एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज दिले.
राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील निर्मल भवन येथे एमएसआरडीसी कार्यालयात याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. येलदरी धरणाच्या उद्भवातून जिंतूर तालुक्याकरिता बंद पाईपलाईनद्वारे (पी.डी.एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. दूरदृश्यप्रणाली द्वारे या बैठकीस परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत संबंधित विभाग प्रमुखांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचे व प्रगतीचे सादरीकरण केले. जिंतूर तालुक्यातील अवर्षणप्रवण तसेच सिंचनाच्या अल्प सोयी असलेल्या भागातील शेतकऱ्यांची बंद पाईपलाईनद्वारे (पी.डी.एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. येलदरी धरणातून उपसा करून जिंतूर तालुक्यातील केहाळ, सावंगी म्हाळसा, हिवरखेडा, चारठाणा, भोसी यांसारख्या अनेक गावांना सिंचनाचा लाभ मिळणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने व्यापक जनहिताचा हा प्रश्न सोडवीण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिले.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यावेळी म्हणाल्या, जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविणे ही शासनाची प्राथमिकता आहे. बदलती पीक पद्धती, या पिकांना सिंचनासाठी आवश्यक पाणी पुरवठा आणि संबंधित सर्व मुद्द्यांचा अभ्यास प्राधान्याने करावा. व्यापक शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पुढील कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.