शहरात घर फोड्या आणि चोऱ्यांच्या घटनांनी धुमाकूळ घातला आहे. एका मागून एक घडणाऱ्या या गुन्हांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांची गस्त आणि सुरक्षा व्यवस्था केवळ एक औपचारिकता उरली आहे का?. असा संतप्त सवाल आता नागरिकांतून विचारला जात आहे.
नुकतीच सहकार नगर भागातील रहिवासी कपिल देशमुख यांच्या बंद घराला गोल्डन लक्ष केले. चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मोठा एवज लंपास केला. या घटनेप्रकरणी देशमुख यांनी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून. त्यानंतर प्रशासनाला स्मरणपत्रही देण्यात आले आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलेले नाही. या घटनेव्यतिरिक्त शहरातील इतर दोन ते तीन ठिकाणी अशाच प्रकारे घरफोड्या झाल्याची माहिती समोर आली आहे. चोरटे राजरोसपणे बंद घरे शोधून डल्ला मारत असल्याने पोलीस गस्तीचा कोणताही धाक गुन्हेगारांवर उरलेला नसल्याचे दिसत आहे…..
…पोलिसांपुढे मोठे आव्हान…
एकाच भागात लागोपाठ होणाऱ्या या चोऱ्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर चोरट्यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक स्वतःला असुरक्षित समजत असून पोलिसांनी केवळ कागदोपत्री कारवाई न करता रात्रीची गस्त वाढवावी आणि या टोळीचा पर्दाफाश करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे….
