वेरूळ लेणी–घृष्णेश्वर मंदिर मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व पर्यटक त्रस्त

खुलताबाद : वेरूळ लेणी ते घृष्णेश्वर मंदिर या मार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वेरूळ लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी दररोज हजारो पर्यटक आणि भाविक या मार्गाने ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृतरीत्या उभ्या करण्यात येणाऱ्या चारचाकी, तीनचाकी आणि दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर पार्किंगमुळे वाहनांची लांबच लांब रांग लागत असून प्रवाशांना तासन्तास खोळंबा सहन करावा लागत आहे.
वाहतुकीची ही कोंडी अपघातांना आमंत्रण देणारी ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
अतिक्रमणामुळे समस्या अधिक गंभीर
रस्त्यालगत असलेल्या टपऱ्यांनी केलेले अतिक्रमण आणि त्यांच्या समोर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यटकांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने गर्दीतून मार्ग काढणे अवघड बनले आहे. परिणामी रस्ता आणखी अरुंद झाला असून वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि पर्यटकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोकळा श्वास कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.