छत्रपती संभाजीनगर
शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून, आता नागरिकांचे रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फिरणेही कठीण झाले आहे. आपले व्यावसायिक काम आटोपून घराकडे पायी निघालेले भंगार व्यावसायिक अब्दुल बाशिद हकीम खान (वय ४५, रा. कैसर कॉलनी) यांची दोन अज्ञात गुंडांनी मांडीत चाकू खुपसून क्रूर हत्या केली. ही धक्कादायक घटना आज, गुरुवारी (२ जुलै) पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास शहरातील अत्यंत वर्दळीच्या जालना रोडवरील आकाशवाणी परिसरातील पंचम बारसमोर घडली. हत्येनंतर हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईल लुटून पळ काढला. गेल्या काही महिन्यांत शहरात सर्रास घडणाऱ्या लुटमारीच्या घटना आणि पोलिसांच्या ढिसाळ गस्तीमुळे आता सामान्यांचे रस्ते सुरक्षित राहिले नसल्याची तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.या खळबळजनक हत्याकांडाची सविस्तर हकीकत अशी की, मयत अब्दुल बाशिद हे आपल्या पत्नी आणि चार मुलांसह कैसर कॉलनी भागात राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते भंगार व्यवसाय करत होते. बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते घरीच होते, त्यानंतर जेवण करून महत्त्वाच्या व्यावसायिक कामाचे कारण सांगत ते घराबाहेर पडले होते.काम आटोपून रात्री २ वाजण्याच्या सुमारास ते बाहेरगावून शहरात परतले. जालना रोडवरील एस.एफ.एस. शाळेपुढे रिक्षातून उतरल्यानंतर ते जिन्सीच्या दिशेने पायी जात होते. याचवेळी पंचम बारसमोर दोन अज्ञात गुंडांनी त्यांना अडवले. अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी त्यांना रस्त्याच्या कडेला ओढत नेऊन मारहाण सुरू केली. अब्दुल बाशिद यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका हल्लेखोराने त्यांच्या मांडीत धारदार चाकूने सपासप वार केले.चाकूच्या वारांमुळे मांडीतील मुख्य रक्तवाहिनी कापली गेल्याने अब्दुल बाशिद गंभीर जखमी झाले. या रक्तबंबाळ अवस्थेतच त्यांनी रस्त्यावर धावत येत एका रिक्षाचालकाकडे वाचवण्यासाठी आर्त मदत मागितली. मात्र, अंगावरून होणारा प्रचंड रक्तस्त्राव पाहून तो रिक्षाचालक घाबरला आणि त्यांना मदत न करताच तिथून निघून गेला. दरम्यान, सुदैवाने शहरात रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांच्या ‘डायल ११२’ च्या कर्मचाऱ्यांनी रक्ताच्या थारोळ्यातील व्यक्ती पाहून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वेळ न गमावता अब्दुल बाशिद यांना दुसऱ्या एका रिक्षात टाकून शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचार सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.अब्दुल बाशिद हे रुग्णालयात दाखल करेपर्यंत पूर्णपणे शुद्धीवर होते. शासकीय रुग्णालयात जात असताना त्यांनी रिक्षाचालकाला आपल्या मोठ्या मुलाचा मोबाईल क्रमांक तोंडी सांगून घटनेची माहिती देण्यास सांगितले होते. माहिती मिळताच त्यांच्या मुलाने आणि भावाने घाटीत धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. हल्लेखोरांनी अब्दुल बाशिद यांच्याकडील मोठी रक्कम लुटण्याच्या उद्देशातूनच हा हल्ला केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हल्लेखोरांनी घाईघाईत त्यांचा मोबाईल चोरला, मात्र खिशातील ५०० रुपयांची नोट तशीच मिळून आली.