पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत भविष्यासाठी मान्यवरांचा संकल्प
महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. चिंतनगाह परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली.
यावेळी ‘सिटी फार्मिंग’ या अभिनव संकल्पनेची माहिती देत शहरी भागातील सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करून त्याच ड्रममध्ये झाडे, फुले, औषधी वनस्पती आणि भाजीपाल्याची लागवड करण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे कचऱ्याचे पुनर्वापर, प्रदूषण नियंत्रण, कार्बन शोषण वाढ आणि शहरांमध्ये हिरवळ निर्माण होण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. आर.आर. देशपांडे, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्राचार्या डॉ. विजया मुसांडे, डॉ. के.एम. जाधव, डॉ. विजया प्रधान, प्रवीण देशमुख यांच्यासह विद्यापीठातील संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विभागप्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी वृक्षारोपण, नदी संवर्धन आणि स्वच्छता मोहिमांद्वारे हरित, स्वच्छ व शाश्वत भविष्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश दिला.
